ठाणे – सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानातंर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे.
याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी छोट्या, मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येत आहे. १२५ छोट्या आणि ९६ मोठ्या घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून ‘मतदारराजा जागा हो’ हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे.घंटागाड्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात. त्या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात. या वेळेचा सदुपयोग करून त्या काळात मतदार नोंदणी, बदल यांच्याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिली. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी या जागृतीचा निश्चितच उपयोग होईल, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.