ठाणे (प्रतिनिधी) वाढत्या लोकसंख्येनुसार दिव्यातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर दिव्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समस्यांचा पाढाच वाचला असून त्यासंदर्भातील समस्यांचे निवेदन भारतीय जनतापार्टीचे ठाणे जिल्हा शहर उपाध्यक्ष विजय भोईर आणि पदाधिकारी यांनी दिले आहे.
ठाणे जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ०६ ऑक्टोबर २०२५, गुरुवार, रोजी राम गणेश गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे वनमंत्री श्री. गणेशजी नाईक यांच्या वतीने “जनता दरबार” आयोजित करण्यात आला.या दरबारात दिवा विभागातील नागरिकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या.
विशेषतः दिवा स्टेशनपासून आगासन, मुंब्रा देवी कॉलनी रोड, दिवा टर्निंग परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि नागरिकांची व्यथा यावर सविस्तर चर्चा झाली.
अनेक वेळा लेखी निवेदने सादर करून तसेच रस्ता रोको आंदोलन करूनही दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांकडून पुरेसे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरताची सबब पुढे करून कोणतीही ठोस कार्यवाही न करण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
याउलट फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या वसुलीवाल्याचे बळ मात्र वाढले आहे. तसेच, दिवा विभागातील वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांना होत असलेली तीव्र गैरसोय याबाबतही चर्चा झाली.या सर्व तक्रारींवर वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून, समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
जनता दरबार प्रसंगी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे , भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप लेले , भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय अनंत भोईर,शिवशक्ती रिक्षा युनियन अध्यक्ष श्री. विनोद भगत, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश शिक्षण प्रकोष्ठाचे श्री. नरेश पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

