ठाणे : येत्या सोमवारी 02 मार्च 2026 रोजी होळी व 03 मार्च 2026 रोजी रंगपंचमी हा सण असून सर्वांनी पर्यावरणभिमुख पद्धतीने साजरा करावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले आहे. होळी हा आनंद, उत्साह आणि एकोप्याचा सण असला तरी तो साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे महापौरांनी नमूद केले.दरम्यान दिवा शहरातील कचऱ्याची समस्या पाहता होळीच्या सणात प्लस्टीकच्या पिशव्यांचा वापर सर्वांनी टाळा आणि स्वताच्या परिसराची स्वता काळजी घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शहरातील विविध ठिकाणी रंगांची उधळण होते.आपला सण आनंदाने साजरा करावाच.परंतु सण साजरा करताना त्यात प्लस्टीकच्या पिशव्यांच फुग्यांचा ढिग रस्त्यावर दिसून येतो.धुळीचे कण हवेत वाढले जातात.परिमाणी आरोग्यावर परिणाम होऊन दुसऱ्या दिवशी डाक्टरांकडे रांगा लागलेल्या दिसून येतात. दिवेकर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना आणि कचऱ्याची समस्या पाहता पर्यावरण पुरक होळी साजरी करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे.
होळीसाठी झाडे तोडू नयेत. तसेच रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे तसेच पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. प्राण्यांवर रंग टाकणे किंवा त्यांना त्रास देणे टाळावे, होळीच्या उत्सवात पाण्याचा अपव्यय न करता कोरडी होळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
“पर्यावरणपूरक होळी साजरी करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडूया,” असे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

