सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार २८ टक्के ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेले असताना निवडणूक कधी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक होईल, असे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
अनेक महत्त्वांच्या महापालिकांचा कार्यकाळ संपून तीन-चार वर्ष सरलेली आहेत. नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदेची देखील तीच तऱ्हा आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे निवडणुका रखडल्या होत्या. परंतु २८ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे नाशिकमध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी त्यांना विचारण्यात आले असता डिसेंबर जानेवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

