लांजा (प्रतिनिधी) अक्षर मानव या महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या अभियानाची राज्यस्तरीय बैठक व पदाधिकारी संमेलन शनिवार दि.२९ व रविवार दि.३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत तालुक्यातील केळंबे येथील अमृत सृष्टी कदम फार्म येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नितीन कदम यांनी दिली.
प्रख्यात साहित्यिक राजन खान सर—ज्यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून धर्म, समाजकारण, साहित्य, संस्कृती आणि मानवी मूल्यांवर आयुष्यभर अभ्यास केला—ते आता अक्षर मानव या उपक्रमातून महाराष्ट्रभर नव्या विचारांचा प्रकाश पसरवत आहेत. याच उपक्रमाच्या निमित्ताने अक्षर मानवच्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक व पदाधिकारी संमेलन शनिवारी दि .२९ व रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या संमेलनासाठी राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मात्र शनिवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता खास सत्र लांजा तालुका व शहरातील स्थानिक नागरिकांसाठी ठेवण्यात आलेले आहे.
या सत्रामध्ये राजन खान सर प्रत्यक्ष उपस्थित राहून विचारांची दिशा, साहित्याचा ध्यास, समाजातील बदल, मानवी मूल्यांची गरज, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा मार्ग आपल्या खास शैलीतून मांडणार आहेत.
हा कार्यक्रम म्हणजे केवळ व्याख्यान नाही
तर मनाला हलवून टाकणारा, विचारांना नवी दिशा देणारा, जीवन समजून घेण्याचा एक दुर्मीळ अनुभव आहे. तरी या कार्यक्रमाचा व संवादाचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या अभियानाचे जिल्हाध्यक्ष युयूस्तु आर्ते व मुख्य संयोजक नितीन कदम यांनी केले आहे.

