Thane l दिवा परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दररोज सुमारे 12 MLD (मिलियन लिटर प्रति दिवस) पाण्याची कमतरता भासत असल्याची माहिती समोर आली आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था आणि रखडलेले प्रकल्प यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान 27 मार्चला ठाण्यातील काही 24 तास भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने त्याच्या परिणाम जनजीवनावर होणार आहे.
दिव्यातील नागरिकांच्या मते, अनेक भागात पाणीपुरवठा अत्यंत अनियमित असून फक्त 10 ते 15 मिनिटांसाठीच पाणी येते. त्यातही कमी दाबामुळे पुरेसे पाणी साठवता येत नाही. परिणामी, अनेक सोसायट्या आणि रहिवाशांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे घरगुती खर्चात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंब्रा आणि आसपासच्या भागातही अशाच प्रकारची परिस्थिती असून संपूर्ण परिसरात पाणीपुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी सुरू असलेले पाइपलाइन, जलसाठा टाक्या आणि इतर प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “दरवर्षी नवीन आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
महापालिकेने लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असले तरी, सध्याच्या परिस्थितीत दिव्यातील पाणीटंचाई ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे. योग्य नियोजन आणि तातडीच्या उपाययोजना केल्याशिवाय या प्रश्नावर तोडगा निघणार नाही, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

