ठाणे – देशांतर्गत खाद्यतेल उत्पादनात वाढ व तेलबिया पिकांमध्ये शेतकऱ्यांना उच्च उत्पन्न मिळावे यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना भुईमूग व तिळाच्या उच्च प्रतीच्या बियाण्यांचे 100% अनुदानावर वितरण जाहीर करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
उच्च प्रतीच्या बियाण्यांचा साठा जिल्ह्यांत उपलब्ध असून, अभियानांतर्गत रब्बी हंगाम 2025 साठी भुईमूग पिकासाठी हेक्टरी 150 किलो (रक्कम रु.114 प्रती किलो) शेंगा व तीळासाठी हेक्टरी 2.5 किलो (रक्कम रुपये 197 प्रती किलो) प्रमाणित बियाणे केंद्र शासनाने विडकेलेल्या जिल्ह्यांना 100 टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहेत. यामध्ये भुईमूग पिकाचे 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाण्यांचा लाभ नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभजीनगर व अकोला या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे. तसेच तीळ पिकाचे 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाण्यांचा लाभ जळगाव, बीड, लातूर व बुलढाणा या 4 जिल्हयातील शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे
शासकीय बियाणे पुरवठादारा संस्थांचा भुईमूग बियाणे 20 ते 30 किलो पॅकच्या स्वरूपात तर तिळ बियाणे 500 ग्रॅम ते 1 किलो पॅकिंग साईज मध्ये उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांच्या पॅकिंग साईज प्रमाणे बियाणे वितरीत करण्यात येतील. क्षेत्रानूसार आवश्यक बियाण्यापेक्षा पॅकिंग साईज नुसार अधिकचे बियाणे परीगणित होत असल्यास याकरिताची रक्कम शेतकऱ्यांना स्वहिश्याने भरावी लागेल. भुईमूग व तीळ पिकाच्या बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgrilLogin या संकेत स्थळाला भेट द्यावी.
शेतकरी मान्यताप्राप्त बियाणे वितरकांकडून हे बियाणे घेऊ शकतात. या बियाण्यांचे वितरण ‘स्टॉक उपलब्धतेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.
अर्जासाठी शेतकरी Agristack मध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. नोंदणी नसल्यास अर्ज मान्य करण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रथम Agristack नोंदणी पूर्ण करावी.राज्यातील भुईमूग व तिळाच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 100% अनुदानावर मिळणाऱ्या या उच्च प्रतीच्या बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी आयुक्तालय, पुणे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) र. शा. नाईकवाडी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

